अमरावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी नागपूर दौऱ्यापूर्वी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करावे,” असे आव्हानच राणा यांनी दिले.
रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. “आज उद्धव ठाकरे हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाची भाषा बोलत आहेत. यावरून त्यांचे शुद्धीकरण सुरू झाले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
हनुमान चालीसा आंदोलनाची आठवण करून देताना राणा म्हणाले, “मी आणि तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून 14 दिवस तुरुंगात ठेवले. आज तेच उद्धव ठाकरे हिंदुत्व आणि हनुमान चालीसेचा पुरस्कार करत आहेत.
यावेळी रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना अमरावतीतील प्रसिद्ध हनुमान गढी येथे येण्याचे खुले निमंत्रणही दिले. “ते अमरावतीत आले तर मी स्वतः त्यांचे स्वागत करेन आणि त्यांच्यासोबत बसून हनुमान चालीसेचे पठण करेन,” असे ते म्हणाले.
रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हिंदुत्व, हनुमान चालीसा आणि ठाकरे-राणा वाद चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागपूर दौऱ्यात उद्धव ठाकरे या आव्हानाला कसे उत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





