अकोला: ‘मी ब्राम्हण मुलीशी विवाह केला, राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा, दलित समाजात आता त्यांच्या योग्य मुली आहेत; दलितांच्या घरात जाऊन जेवण करण्याची नौटंकी बंद करावी,’ असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. ते आज (शनिवारी) अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.
जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर रकमेत भरीव वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार कुठलाही पक्ष करीत नसतो. त्यामुळे भाजपच्या सत्तेत अत्याचार वाढले, असे म्हणणेही योग्य नाही.
Featured Products
गुजरातमध्ये भाजपला 120 ते 125 जागा मिळतील, असा आशावाद व्यक्त करून आपण प्रचाराला जाणार आहोत. दलितांच्या मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून आपण एकही उमेदवार गुजरातमध्ये उभा करणार नाही, असे ते म्हणाले. गोहत्या बंदीला पाठिंबा असून गोवंश हत्या बंदीला विरोध आहे. कारण बीफ खाण्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कायद्यातला वंश शब्द काढण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे ते म्हणाले.









