मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांत 39 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाल्याबद्दल संशय व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आकडेवारीच्या आधारे त्यांनी राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
राहुलजी, 2009 मध्ये काय झालं होतं ते लक्षात ठेवा-
बावनकुळे म्हणाले, “एप्रिल 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर ऑक्टोबर 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी हेच मतदारसंख्येचं प्रमाण 7 कोटी 59 लाख 68 हजारांवर पोहोचलं. म्हणजेच, अवघ्या पाच महिन्यांत 30 लाख मतदारांची भर पडली होती. तेव्हा कुणी घोटाळ्याचा आरोप केला नव्हता, राहुलजी, तेव्हा आयोगावर तुमचा विश्वास होता का? की तेव्हाही काँग्रेस-आयोग युती होती?”
स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका-
ते पुढे म्हणाले, “2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा कोणालाच संशय वाटला नाही. आज मात्र जनतेनं तुम्हाला नाकारलं, महाराष्ट्रात तुम्हाला झिडकारलं आणि तुम्ही पराभवाची कारणं शोधायला लागलात. आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशात गोंधळ निर्माण करू नका.”
भीती ही बिहारमधील पराभवाची?
बावनकुळे यांनी थेट टोला लगावत म्हटलं, “महाराष्ट्रानंतर आता बिहारमधूनही जनतेनं काँग्रेसला हद्दपार करण्याची तयारी केली आहे. हीच भीती राहुल गांधींच्या वक्तव्यांमधून झळकत आहे.”
जनतेचा अपमान करू नका-
महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. हा विश्वास आम्ही टिकवून ठेवू. राहुल गांधी वारंवार खोटे बोलून जनतेचा अपमान करत आहेत. ही जनता कधीच विसरत नाही आणि वेळ आल्यावर उत्तरही देते,असे बावनकुळे म्हणाले.