नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या भारतातील तरुणांसमोर उभ्या असलेल्या संकटावर लक्ष वेधले आहे. त्यांनी बेरोजगारी आणि मतचोरी यांचा संबंध जोडत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती आहे.”
राहुल गांधींनी सोशल मीडियावर तरुण आणि पोलिसांमधील संघर्ष दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले असून, त्यांनी म्हटले आहे की, भाजपाने प्रामाणिकपणे निवडणुका जिंकत नाहीत, ते मतं चोरून आणि संस्थांवर नियंत्रण ठेवून सत्तेत टिकतात.
ते पुढे म्हणाले, “भारतातील तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. बेरोजगारी ४५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी होत आहेत, भरती प्रक्रिया कोलमडल्या आहेत आणि तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. प्रत्येक परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणांशी जोडली जाते आणि भरती भ्रष्टाचाराने भरलेली असते.”
राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करत पुढे सांगितले, “तरुण कठोर परिश्रम करतात, स्वप्न पाहतात आणि त्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करतात, पण मोदी फक्त स्वतःचा जनसंपर्क, सेलिब्रिटी जाहिराती आणि अब्जाधीशांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. तरुणांच्या आशा चिरडून टाकणं आणि त्यांना निराश करणं ही या सरकारची ओळख बनली आहे.”
ते म्हणाले, “परिस्थिती बदलत आहे. भारतातील तरुणांना समजलं आहे की, खरा लढा फक्त नोकऱ्यांसाठी नाही तर मतचोरीच्या विरोधात आहे. जोपर्यंत मतचोरी होईल तोपर्यंत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहील. तरुण आता नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाहीत.”
राहुल गांधींच्या या विधानामुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका आणि राजकीय चर्चेला नवीन उभारी मिळाली आहे.