Published On : Sat, Feb 24th, 2018

सातारा येथे ५१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पोवई नाका उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Advertisement

सातारा : येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवई नाका येथे बांधण्यात येणाऱ्या उड्‌डाणपुलाचे (ग्रेडसेपरेटर) भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शंभुराज देसाई, विधानपरिषद सदस्य आनंदराव पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर,अधीक्षक अभियंता एस. एस. माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांसमवेत त्यांनी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केले.

पोवई नाका येथील नियोजित उड्डाणपुलामुळे सातारा शहरात येणारी तब्बल ४० टक्के वाहतूक विभागली जाणार आहे. येत्या दोन वर्षात हा उड्डाणपूल बांधून पूर्ण होईल. सुमारे ५१.५० कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल तयार करण्यात येईल. या उड्डाणपुलाची लांबी १२३० मीटर इतकी आहे. कोल्हापूर, पंढरपूरकडून येणाऱ्या मोठ्या जड वाहनांना थेट बसस्थानकाकडे विनाअडथळा जाता येईल. कास व राजवाड्याकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना वेगळी मार्गिका देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या बाजूने जाण्यासाठी स्वतंत्र सेवा रस्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी २०० मीटर लांबीची पावसाळी लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या कामासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्यात आले आहे. रस्ते व वाहतूक सर्वेक्षण तसेच भूस्तर तपासणीही पूर्ण झाली आहे. या उड्डाणपुलामुळे पोवई नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.