Published On : Mon, Aug 19th, 2019

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्यच हवे : ऊर्जामंत्री

Advertisement

एनटीपीसी आढावा बैठक
450 जणांना कंत्राटदाराकडे नोकरी

नागपूर: मौदा येथील एनटीपीसीच्या ऊर्जा प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्यच दिले गेले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांचा तो अधिकार आहे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनटीपीसी प्रशासनाला दिले. एकूण 784 प्रक़ल्पग्रस्त कुटुंब असून यापैकी 450 जणांना कंत्राटदाराकडे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. 262 प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी 5 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. 51 जणांना कायम नोकरी देण्यात आल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली.

या बैठकीला एनटीपीसीचे महाव्यवस्थापक आलोक गुप्ता, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मौदा न.प. अध्यक्ष भारती सोमनाथे, टेकचंद सावरकर, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, उपविभागीय अधिकारी सवरंगपते, अविनाश कातडे व अन्य उपस्थित होते. बाबदेव येथील समाजभवनाचे काम येत्या 2 दिवसात पूर्ण होईल. तसेच कुंभारी येथे ड्रेनेज लाईन, पोच रस्ता, जि.प. शाळांमध्ये स्वच्छता गृहे, वॉल कंपाऊंड ही कामे येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होतील.

तालुक्यातील इसापूर, आजनगाव, राहाडी येथे जलशुध्दीकरण यंत्रासह एटीएम लावून देण्यात येतील. लापका, नवेगाव, कोराडी येथे 3 प्लान्ट घेण्यात येणार आहे. आठ सोलर हायमास्ट लाईट लावून देण्या येणार. याशिवाय प्रकल्पग्रस्तांची 73 जणांची यादी नोकर्‍यांसाठी पाठविली आहे. पण अजून त्यांना रोजगार उपलब्ध झाला नाही. प्रकल्पग्रस्तांमध्ये 100 टक्के लोकांना रोजगार देण्याचे ठरले असून त्यांना प्राधान्य दिलेच पाहिजे. यावर एनटीपीसीतर्फे सांगण्यात आले की, काही लोक काम करू इच्छित नाही. तसेच काही जण नोकरीवर घेतल्यावर 3-4 दिवस येतात. नंतर येतच नाही. 202 तरुणांना आयटीआयतून प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी 47 तरुण परीक्षा देऊन पात्र ठरले.

रोजगार गॅरंटी योजनेत 10-12 गावांमध्ये सीएसआरमधून 15 दुकाने बांधून ग्रामपंचायतच्या स्वाधीन करा म्हणजे तरुणंना काही उद्योग सुरु करता येईल, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

प्रकल्पग्रस्त असलेल्या 12 गावांमध्ये मोठे आरोग्य शिबिर एनटीपीसीने घ्यावे, अशी सूचना करून पालकमंत्र्यांनी सांगितले की, कोराडी महानिर्मितीने तयार केलेला 500 तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा. त्या विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये शिष्यवृत्ती द्या.

याशिवाय कुंभारीचे राष्ट्रीय महामार्गावर पुनर्वसन, कुंभारी गावातील उर्वरित जमीन एनटीपीसीने संपादित करणे, प्रकल्पग्रस्त बेरोजगार सहकारी संस्थांना कंत्राटी स्वरूपाची कामे देणे, राखेचे पाणी झिरपल्यामुळे पाणीपुरवठा योजना दूषित झालेल्या गावांमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याचे प्लाण्ट बसविणे, लापका-धामणगाव रस्त्यावर अतिजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होतो. या रस्त्याचे सिमेंटीकरण करणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.