
मुंबई : देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची जोरदार चर्चा सुरू असून या नव्या राजकीय प्रयोगामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख “झुरळ” असा केल्याच्या वादानंतर अभिजीत दिपके यांनी या पक्षाची स्थापना केली. सोशल मीडियावर काही दिवसांतच या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत असताना आता काही प्रमुख नेते आणि समाजसेवकांनीही या पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी दिला आधार-
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्याशी संवाद साधत कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आश्वासन दिले.
या भेटीनंतर कॉकरोच जनता पार्टीला राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यावर टीका करत बेरोजगार तरुणांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले होते. या विधानामुळे अनेक युवकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
अण्णा हजारेंचाही पाठिंबा-
ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांनीदेखील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. युवकांना “झुरळ” अशी उपमा देण्यामागील उद्देश काय होता, याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
“पक्षाचे नाव वादग्रस्त वाटू शकते, मात्र त्या नावामागे मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण एकवटत आहेत, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही,” असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
युवा शक्ती हीच देशाची ताकद-
अण्णा हजारे यांनी पुढे बोलताना देशाच्या विकासासाठी तरुणांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवकांकडे दुर्लक्ष करून राष्ट्र प्रगती करू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याचवेळी त्यांनी केंद्रातील लोकपाल आणि राज्यातील लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कायदा मंजूर होऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा आंदोलनाची गरज भासणार का, असा सवाल त्यांनी केला.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा-
कॉकरोच जनता पार्टीची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. काही जण या आंदोलनाला बेरोजगार तरुणांचा आवाज मानत आहेत, तर काहींनी पक्षाच्या नावावरून टीका केली आहे.
मात्र, या संपूर्ण घडामोडींमुळे बेरोजगारी, युवकांचे प्रश्न आणि राजकीय भाष्य या मुद्द्यांवर देशभरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.








