Published On : Fri, May 21st, 2021

सकारात्मकता हीच सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली

Advertisement

मनपा-आयएमए आयोजित कोव्हिड संवाद कार्यक्रमात तज्ज्ञांनी दिला मंत्र

नागपूर : आयुष्यात सकारात्मकता असणे अत्यंत आवश्यक आहे. सकारत्मकता आणि कुठलेही प्रश्न, समस्या सोडविण्याची आत्मीयता हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. हीच सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञांनी केले.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २१) आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव पळसोडकर आणि डॉ. प्रीतम चांडक सहभागी झाले होते. याप्रसंगी ते बोलत होते. ‘कोव्हिडकाळात येणारे नैराश्य आणि त्यावर मात’ हा कार्यक्रमाचा विषय होता.

डॉ. राजीव पळसोडकर म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी आपले मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे. अनेक लोकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते स्वत:च्या मनात भीती घालून घेतात. अनेक शंका त्यांच्या मनात निर्माण होतात. आता कसे होईल, रुग्णालयात दाखल व्हावे लागले तर कसे होईल, मी यातून ठीक होईल की नाही, माझ्यामुळे कुटुंबीयांना उगाच त्रास होईल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करतात. मला कोरोना झाला आहे हे सत्य समोरचा व्यक्ती जेवढ्या लवकर मान्य करेल, तितक्या लवकर तो कोरोनातून बरा होईल, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. यापुढे आपल्याला कोरोनासोबतच मानसिक आरोग्यासाठी लढा द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, अनेक कोरोनाबाधित गृहविलगीकरणामुळे नैराश्येच्या गर्तेत जातात. एका अभ्यासानुसार, ज्यांना कोव्हिड झाला असे ५० टक्के रुग्ण, जे केवळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात असे २२ टक्के रुग्ण आणि जे अतिदक्षता विभागात भरती आहेत अशा ३८ टक्के लोकांना नैराश्याने झपाटले आहे. सकारात्मक राहणे आणि ज्या समस्या आहे त्यातून सकारात्मक राहून मार्ग काढणे, हा एकमेव उपाय असल्याचे डॉ. पळसोडकर यांनी सांगितले.

डॉ. प्रीतम चांडक म्हणाले, कोव्हिड काळात न्यूज चॅनलवर येणाऱ्या बातम्या हे नैराश्य आणि तणाव वाढण्यास कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे त्यापासून दूर राहणे, सोशल मीडियावर फिरत असलेल्या तथ्यहीन संदेशांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. जगभरात ज्यावर संशोधन झाले आहे, अशा तथ्यांवरच विश्वास ठेवावा, असा सल्ला त्यांनी दिला. दुसऱ्यांच्या वागण्यावर आपण बंधने घालू शकत नाही. मात्र, आपले वागणे आपण बदलवू शकतो. एस.एम.एस या त्रीसूत्रीचा वापर प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर आणि मास्क ह्या आता आवश्यक गोष्टी आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधीत होऊ शकतात, असा एक अंदाज आहे. त्यानुसार आता आपणच आपली आणि लहान मुलांची काळजी कोरोना नियमावलीचे पालन करीत घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement