नागपूर — शहर पोलीस आयुक्तालयात आज “तक्रार निवारण दिन” जनतेच्या विश्वासाला आणि भावनांना केंद्रस्थानी ठेवून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला.
आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नागपूरच्या सर्व 33 पोलीस ठाण्यांमध्ये समन्वयपूर्ण पद्धतीने तक्रारदारांच्या समस्या ऐकल्या गेल्या. या उपक्रमात एकूण 419 तक्रारदारांनी सहभाग घेतला तर 496 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले, ही या मोहिमेची महत्त्वपूर्ण फलश्रुती ठरली.
तक्रारींचा परिमंडळनिहाय आढावा घेतला असता, परिमंडळ 1 मध्ये 75, परिमंडळ 2 मध्ये 89, परिमंडळ 3 मध्ये 114, परिमंडळ 4 मध्ये 69 तर परिमंडळ 5 मध्ये सर्वाधिक 149 तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
या प्रक्रियेतून एकूण 12 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद, 1 प्रतिबंधक कारवाई, 6 तक्रारींवर पूर्वीच नोंदवलेली एफआयआर, तर 9 प्रकरणांमध्ये प्रस्तावित एफआयआरसाठी पुढील कार्यवाही सुरू आहे. याच दिवशी नव्याने 4 एफआयआर दाखल करण्यात आले.
धंतोली पोलीस ठाण्याचे उल्लेखनीय कार्य-
स्थानिक नगरसेवक व नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या. तर बेलतरोडी ठाण्यात “तक्रार निवारण बोर्ड” उभारण्यात आला असून, प्रत्येक शनिवारी नागरिकांना ठाणेदारांशी थेट भेटण्याची संधी दिली जात आहे.
न्याय मिळतोय, ही जाणीव ठळक-
काही प्रकरणांमध्ये कायदेशीर सल्ला आणि समुपदेशनाद्वारे तक्रारदारांचे समाधान करण्यात आले. “आपली बाजू ऐकली जातेय” ही भावना तक्रारदारांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी जाहीर केले की, आता प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत “तक्रार निवारण दिन” नियमित राबवला जाणार आहे. यासाठी सहायक व अपर पोलीस आयुक्त स्तरावरील अधिकारी देखरेख ठेवतील.
नागपूर पोलीसांचा जनतेशी दृढ संवाद
हा उपक्रम नागरिक आणि पोलिसांमधील संवाद, विश्वास व पारदर्शकतेचा नवा अध्याय ठरला आहे. नागपूर पोलीस “तुमचं म्हणणं ऐकलं जातंय” या भावनेला मूर्त स्वरूप देत, जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहेत, हे या मोहिमेतून अधोरेखित झाले.