नागपूर: केंद्रातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांची तुलना काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या कालखंडाशी करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली.
किसान सन्मान यात्रा म्हणजे राजकीय नाट्य –
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या असून, त्या यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाणे, पांदण रस्त्यांचे विकासकाम, पीएम किसान योजनेतून आर्थिक मदत, पीक विमा अशा निर्णयांचा उल्लेख करत बावनकुळे यांनी भाजप सरकारच्या कामगिरीचा दाखला दिला.
राहुल गांधी यांच्या किसान सन्मान यात्रेवर निशाणा साधताना ते म्हणाले, “यात्रा काढणं ही काँग्रेसची सवय आहे. प्रत्यक्षात काही न करता केवळ जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.”
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांच्या बदलांबाबतची भूमिका योग्य असून, प्रशासन कार्यक्षम ठेवण्यासाठी दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची बदलती आवश्यकता आहे, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवर खुलासा-
जिल्हाध्यक्ष निवडीतील नाराजीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “प्रत्येक पदासाठी अनेक इच्छुक असतात. काही कार्यकर्त्यांना वाटणारी नाराजी ही स्वाभाविक आहे. मात्र, अशा कार्यकर्त्यांना पक्षात अन्य जबाबदाऱ्या दिल्या जातील.”
शिंदेंवर आरोप करणाऱ्यांचा आत्मपरीक्षण करावा –
शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे सरकार घोटाळ्यांनी ग्रासलेले होते. त्यांनी कोरोना काळात मंत्रालयात हजेरी लावली नाही, निधीचा गैरवापर झाला, आणि जनतेसाठी ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. अशा पाश्वभूमीवर शिंदेंवर आरोप करणाऱ्यांची नैतिकता काय आहे?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “देशातील जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला आहे. दहशतवादविरोधी कारवायांमुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट झाली आहे.”
वनविभागाच्या निष्काळजीपणावर संताप –
वन्यजीव हल्ल्यांवरील घटनांबाबत बोलताना त्यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. “बफर झोनमध्ये आवश्यक यंत्रणा असूनही उपाययोजना न केल्यामुळे या घटना घडल्या. यावर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार असून, मी स्वतः त्यात सहभागी होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
नक्षलवादाविरोधात सरकारची कठोर भूमिका
नक्षलवाद्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “सरकार कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात आला असून, यामध्ये कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही.