Published On : Tue, Jul 31st, 2018

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : अभय गोटेकर

Advertisement

नागपूर: प्रधानमंत्री आवास योजनेची पुरेपूर माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात यावी. या योजनेच्या लाभार्थ्यांना आवेदन पत्र भरताना त्रास होतो आहे. त्यासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये एक स्वतंत्र कार्यालय नेमून लाभार्थ्यांना योग्य ती मदत करावी, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

मंगळवारी (ता.३१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती उषा पॅलट, सदस्या निरंजना पाटील, रूतिका मसराम, दुर्गा हत्तीठेले, सदस्य परसराम मानवटकर, अतिरिक्त आयुक्त अजीज शेख, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना सभापती अभय गोटेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. ज्या भागात आवास योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे त्या भागातील नगरसेवकांना याबाबत अवगत करण्यात यावे. यासोबतच समिती सदस्यांनाही अवगत करावे, असे निर्देश सभापती गोटेकर यांनी दिले. योजनेचे आवेदन पत्र भरताना लाभार्थ्यांना सुलभता व सुविधा देण्याचे सभापती गोटेकर यांनी निर्देशित केले.

यावेळी रमाई आवास योजनेच्या कामाचा आढावा सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. या योजनेची आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढविण्याचे निर्देश सभापतींनी दिले. रमाई आवास योजनेचे काही घटकवर्ग काम करत नाही, अशी तक्रार आली आहे. जे घटक वर्ग काम करत नाही, त्या जागी नवे घटक वर्ग समाविष्ट करण्यात यावे, असेही गोटेकर यांनी सांगितले.