Published On : Wed, May 1st, 2019

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागाचा संकल्प करु या – बावनकुळे

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन कस्तुरचंद पार्क येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन

नागपूर: अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भिषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Advertisement

ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन करुन सशस्त्र पोलिस दलाच्या पथसंचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. त्यानंतर जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी पालकमंत्र्यांसमावेत उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. काटोल, नरखेड या भागात लोकसहभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

राज्याच्या सर्वांगिण प्रगतीमध्ये शेतकरी उद्योजक तसेच विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कामगार बंधूचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच साजरा झाला असून जनतेने लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेने उत्साहात सहभागी होवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अभिनंदन केले.

यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ.विकास महात्मे, सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि जिल्हा व पोलिस प्रशासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीक उपस्थित होते.

यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलिस पथकाचे संचलन झाले. त्यांच्यासोबत सेकंड इन कमांडर राखीव पोलिस उपनिरीक्षक त्रंबक प्रधान तर राज्य राखीव पोलिस बल गट क्रं.4 चे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोर्ला, गडचिरोलीचे दिलीप तरारे, गोंदियाचे अरुण धुळसे, नागपूर शहर सशस्त्र पोलिस बल शशिकांत नागरगोजे, नागपूर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेष गावंडे, लोहमार्ग पोलिसचे विनोद तिवारी, नागपूर शहर (महिला) पोलिसचे उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकचे घनश्याम दुजे, वाहतुक शाखेचे जितेंद्र ठाकूर, होमगार्ड ‍जिल्हा समादेशकचे प्लॉटून कमांडर रोशन गजभिये आणि श्रीमती संजिवनी बोदेले, बँड पथकाचे प्रदिप लोखंडे, रामु ससाने, संजय पंचभुते, चंद्रकांत मानवटकर, सुरेश सनेश्वर, श्वानपथक ‘जीवा’सह शिवशंकर जोशी, “वज्र” चे विरेनशहा खंडाते, बॉम्ब नाशक पथकाचे विजय मैंद, वरुनवॉटर कॅनानचे संतोष श्रीवास, अग्निशामक दलाचे विनोद जाधव आणि सामान्य रुग्णालयाच्या डॉ.रोहीना शेख यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजावंदन सोहळा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र स्थापना दिनाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते ध्वजारोहण वंदनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement