मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “या देशात माणसांची किंमत राहिलेली नाही. रेल्वेमंत्री राजीनामा देतील का नाही हे महत्त्वाचं नाही, पण त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन तिथली परिस्थिती स्वतः पाहावी, तेच जास्त आवश्यक आहे.”
त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “मुंबईमधल्या रेल्वेची अवस्था जगात कुठेही नसेल. गर्दी, गोंधळ आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही आपल्या लोकांची रोजची लढाई आहे. केवळ रेल्वे नव्हे, संपूर्ण मुंबईच भरकटली आहे – ना नीट रस्ते, ना पार्किंगची सोय, ना नियोजन.”
ठाकरे पुढे म्हणाले, “मेट्रो आली, मोनोरेल आली, पण याचा नेमका उपयोग कोण करतंय हे कुणालाच ठाऊक नाही. मुंबईला शहर म्हणून पाहिलं जात नाही. जे अपघाताच्या ठिकाणी घडलं ते नवीन काही नाही, पण तरीही कोणतीही सुधारणा दिसत नाही.”
त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांनी स्वतःही रेल्वेने प्रवास केले आहेत आणि पूर्वीची गर्दी आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आजच्या घडीला रात्री मेट्रोतही प्रवेश करणं कठीण आहे,असं उदाहरण देत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित केलं.केंद्र सरकारने आता तरी डोळे उघडावेत आणि रेल्वे व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी स्पष्ट मागणी राज ठाकरे यांनी केली.