Published On : Fri, Aug 23rd, 2019

पंतप्रधान किसान मानधन योजनेत सहभागी व्हा पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन

Advertisement

नागपूर: केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी मानधन योजना सुरु केली असून 18 ते 45 या वयोगटातील शेतकर्‍यांसाठी ही योजना असून 55 ते 200 रुपयांपर्यंत प्रिमियम भरले तर शेतकर्‍यांना 60 वर्षाच्या वयानंतर 3 हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

कामठी तालुक्यातील आजनी या गावात पालकमंत्र्याच्या जनसंवाद कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आले. एकूण 11 गावांसाठी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शेकडो गावकरी आपल्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी अनिल निधान, राजकुमार घुले, मोबीन पटेल, देवेंद्र गवते, रमेश चिकटे, उमेश महल्ले, नरेश मोटघरे, पंकज साबळे, मोहन माकडे, गणेश झाडे, अरुण पोटभरे, सरपंच सुनील मेश्राम, दिलीप वानखेडे, प्रमोद घरडे, किरण राऊत, दिवाकर घोडे, उमेश रडके आदी उपस्थित होते.

शेतकरी मानधन योजनेची नोंदणी ग्रामपंचायींमध्ये सुरु आहे. 7/12 वर शेतकर्‍याचे नाव असणे आवश्यक आहे. मानधन घेणार्‍या शेतकर्‍याच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीलाही हा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 गावातील 1820 शेतकर्‍यांना 6 हजार रुपयांचा लाभ मिळाला असून ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज केले नाहीत, त्यांनीही अर्ज करावे. तसेच अपंगांना 35 किलो धान्य स्वस्त देण्यात येत आहे. या योजनेत आता दुर्धर आजाराच्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. लाभार्थी हा बीपीएल असावा. शेतकर्‍याच्या जमिनीचे वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्याचा लाभ 743 शेतकर्‍यांना आतापर्यंत मिळाला आहे.

कृषी अधिकार्‍यांनी शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. ठिबक सिंचनचे अनुदान 3 हजार रुपये प्रतिहेक्टर दिले जाते. सन 19-20 मध्ये 965 शेतकर्‍यांनी 1365 हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असल्याची माहिती त्यांनी दिली. महावितरणने आपल्या आढाव्यात 1100 कोटी रुपये जिल्ह्याच्या यंत्रणा सक्षम करण्यासाठ़ी, नवीन उपकेंद्रासाठी, नवीन कनेक्शनसाठी ऊर्जामंत्र्यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तसेच सहायक निबंधकांनी सांगितले की, कर्जमाफीचा लाभ तालुक्यात 2920 शेतकर्‍यांना मिळाला. तसेच 1140 शेतकर्‍यांना 13 कोटी 32 लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले.

पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना आवंढी पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. येथे आर ओ बसविण्यात येणार आहे. तसेच गुमथळा येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. भोवरी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काम सुरु आहे. गादा, शिरपूर, केम राष्ट्रीय पेयजल योजनेत घेण्यात आले आहे. घोरपड येथे अंतर्गत विहीर खोलीकरण घेण्यात आले आहे. तसेच आजनी येथे नवीन पाणीपुरवठा योजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पंचायत समिती कामठी तर्फे रमाई, शबरी घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. तसेच पालकमंत्री पांदन योजना, रस्त्यांची कामे, जि.प. बांधकाम विभाग, तीर्थक्षेत्र विकासाच्या योजनांचा आढावा लोकांसमोर सादर करण्यात आला. महाऊर्जातर्फे ऊर्जा बचत पथदर्शी कार्यक्रमाअंतर्गत 37 लाख रुपयांचा निधी या गावाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान योजनेत ई कार्ड बीपीएल धारकांनी प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. उपविभागीय अधिकार्‍यांनी पट्टेवाटपाची माहिती सांगितली.

मुख्यालयी न राहणार्‍यांवर कारवाई
या जनसंवाद कार्यक्रमात सरपंचानी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व तत्सम अधिकारी मुख्यालय राहात नाही आणि मुख्यालयी येतच नाहीत अशी तक्रार केली. या संदर्भात पालकमंत्र्यांनी तहसिलदारांना या सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. लोकांना साध्या कामांसाठी कामठी येथे यावे लागते. यापुढे लोकांची कामे तलाठी, ग्रामसेवकांनी केली नाही तर तहसिलदारांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिला.