पालघर : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे १५ ते १६ गावांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुणे घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
पालघरमधील डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. डहाणू शहरासह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे. काही ठिकाणी नागरिक घरांच्या वरच्या मजल्यांवर अडकून पडले असून, बचाव कार्यासाठी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.
पूराच्या पाण्यामुळे डहाणू–विरार मार्गावरील उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने सुमारे १६ गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क खंडित झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, एका नाल्यातून एका पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि त्यांच्यापर्यंत अन्न व इतर आवश्यक मदत पोहोचविण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, सूर्य नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठावरील ६४ ते ६५ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





