Published On : Mon, Apr 1st, 2019

चौकीदार पसरवतोय हिंदू-मुस्लीम द्वेष : असदुद्दीन ओवेसी

Advertisement

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार भारत हे एक धर्माचे राष्ट्र कधीच राहू शकत नाही. अनेक धर्मांचा हा देश आहे. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा कशी आहे. पंतप्रधान असूनही ते हिंदू-मुस्लीमच्या गोष्टी करतात. स्वत:ला चौकीदार म्हणवणारे पंतप्रधानच हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवित आहेत, असा आरोप एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे आणि किरण पाटणकर-रोडगे यांच्या प्रचारार्थ सोमवारी उत्तर नागपुरातील इंदोरा मैदानात आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राजू लोखंडे, वनमाला उके, शहराध्यक्ष रवी शेंडे, प्रकाश टेंभुर्णे उपस्थित होते. यावेळी ओवेसी म्हणाले, हिंदू-मुस्लीमवर चर्चा करायचीच असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी चर्चा करावी, ते पाच मिनिटेही माझ्यासमोर टिकू शकणार नाही. हिंदू-मुस्लीम द्वेष परवता मग महात्मा गांधी यांना गोळी घालून ठार करणार नाथुराम गोडसे हा दहशतवादी आहे की नाही, असा प्रश्न करीत या देशाला तोडणारी नव्हे तर जोडणाऱ्या विचारधारेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा संविधानाच्या गोष्टी करते, परंतु गेल्या पाच वर्षात संविधान कमजोर करण्याचे काम यांनीच केले. देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. या आत्महत्या चौकीदाराला दिसत नाही का,असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसला लकवा मारलाय : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसला लकवा मारलाय आणि निवडणुका संपेपर्यंत त्यांचा हा लकवा नरेंद्र मोदी दूर होऊ देणार नाही. भाजपाविरुद्ध कुणीही सहज जिंकू शकते. खरा रोल येथील फुले-शाहू आंबेडकरी लोकांचा आहे. गेली साडेचार वर्ष ते बिळात घुसून होते, बाहेर पडलेच नाही. त्यांनी किमान मतदानासाठी तरी बाहेर पडावं, असा टोलाही त्यांनी बुद्धिजीवींना लगावला.