नागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे. कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 ऑक्टोबर, 2020 पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाहय (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत पॅकेटबंद खाद्य पदार्थ अथवा मिष्ठान्नाच्या पाकिटांवरती मुदतबाहय तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नातून अन्न विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने आता बाजारात खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नाच्या ट्रेवर अथवा भांडयावर मुदतबाहय तारीख नमुद करणे बंधनकारक केले आहे. विना पॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे अथवा तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. शिळे अन्न पदार्थ खाल्याने विषबाधा होऊ शकते. त्यामुळे ट्रेमधील अन्न पदार्थ विक्री करताना मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही.
जिल्हयातील मिठाई उत्पादक व विक्रेते यांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नागपूरचे सह आयुक्त यांनी केले आहे.