
नाशिक -देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट २०२६ परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नव्या परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणात नाशिकचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये आढळल्याचा दावा केला जात आहे. यानंतर ही प्रश्नपत्रिका हरियाणामध्ये पोहोचवण्यात आली आणि तेथे तिचे तब्बल दहा संच तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात पुढे असेही उघड झाले आहे की, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरपर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचली. अनेक विद्यार्थ्यांकडे मिळालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये शंभर प्रश्न एकसारखे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून विविध राज्यांमध्ये चौकशीची साखळी सुरू आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हरियाणा आणि राजस्थान पोलिसांच्या तपासात नाशिकसह केरळ, राजस्थान आणि झुंझुणू या भागांतूनही पेपरफुटीचे धागेदोरे मिळाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, या घडामोडींवरून राजकीय वातावरणही तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप केला. लाखो विद्यार्थ्यांनी मेहनत, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण सहन करून परीक्षेची तयारी केली, मात्र त्यांना बदल्यात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाच मिळालं, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, “प्रत्येक वेळी पेपर माफिया मोकाट राहतो आणि प्रामाणिक विद्यार्थी भरडले जातात. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी ही घटना आहे,” असेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.








