
नागपूर : अवकाळी पावसानंतर काही दिवस दिलासा मिळालेल्या नागपूरकरांसमोर आता पुन्हा उष्णतेचं संकट उभं राहिलं आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि गुजरात परिसरातील चक्रावाती स्थितीमुळे विदर्भात कोरडी आणि उष्ण हवा वाहत आहे. त्याचा थेट परिणाम नागपूरच्या तापमानावर होत असून शहरातील उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी नागपूरमध्येही उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. सकाळपासूनच कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून दुपारच्या वेळेत नागरिक घरातच राहणं पसंत करत आहेत.
उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे आणि दुपारी ११ ते ३ दरम्यान उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस नागपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.








