Published On : Tue, Jan 28th, 2020

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा अपघात, दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली; आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती

Advertisement

नाशिक : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली असून, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये एक विचित्र अपघात घडला. एसटी आणि रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. मालेगाव-देवळा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला.आतापर्यंत या अपघातातील २० जणांचे मृतदेह हाती लागलेले असून, शोधकार्य सुरु आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसटी आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात आलं.

कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. यादरम्यान, धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ एसटी आणि रिक्षा या दोघांमध्ये जोरदार धडक झाली. बसचा टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमी प्रवाशांना मालेगाव देवळा येथील रुग्णालयात, तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.