Published On : Fri, Jul 31st, 2020

जलमार्ग वाहतुकीमुळे बिहारचा गतीने विकास : नितीन गडकरी

Advertisement

-महात्मा गांधी सेतूवरील नवीन पुलाचे लोकार्पण
-देशातील पहिला ‘स्टेट ऑफ हार्ट’ पूल

नागपूर: बिहारमध्ये जलमार्ग वाहतूक सुरु झाली तर बिहारचा विकास गतीने होईल व वाहतुकीसाठी लागणार्‍या इंधन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन बिहारच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व बिहारमधील विविध वस्तू, पदार्थ कमी खर्चात परदेशात पाठविता येऊन निर्यातही वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

बिहारची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महात्मा गांधी सेतूच्या नवीन ‘अपस्ट्रीम लेन’चे लोकार्पण आज ना. गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते संबोधित करीत होते. या कार्यक्रमाला ऑनलाईन बिहारचे ुमुख्यमंत्री नितीन कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, ना. रामविलास पासवान, ना. नित्यानंद राय, ना. अश्विनी चौबे, ना. जन. व्ही. के. सिंग, ना. नंदकिशोर यादव, खासदार व आमदार उपस्थित होते.

या पुलासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरण्यात आले असून 1742 कोटी खर्च या पुलासाठी येणार आहे. 5575 मीटर लांबी या पुलाची असून सुमो 25 लाख नटबोल्ट या तंत्रज्ञानात काम करताना वापरण्यात आले. उत्तर व दक्षिण बिहारला जोडणारा हा बिहारसाठी महत्त्वाकांक्षी पूल आहे. गंगानदीवरून हा पूल बांधण्यात आला.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- या पुलाच्या कामसाठी जगभरातील तांत्रिक सल्लागारांशी चर्चा करून नंतर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. भविष्यात हे तंत्रज्ञान दिशादर्शक ठरणार असून तांत्रिक विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्ली हे जलमार्ग सुरु झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्रच बदलून जाणार आहे. बिहारच्या विकासासाठी जलमार्ग हे वरदान ठरतील. याशिवाय 10338 कोटींचे 6 पूल बिहारची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करतील, असेही ते म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याशिवाय, आर्थिक विकासासोबत औद्योगिक विकास झाल्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. आणि रोजगार निर्मिती झाली नाही तर गरिबी, भूकमरी संपणार नाही. बिहारच्या रस्त्यांशेजारी विविध उद्योगांचे समूह एकत्र येऊन विकास होऊ शकतो, याचा विचार केला जावा. भयभूक आतंक मुक्त देश बनविणे आपला उद्देश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारच्या विकासासाठी कटिबध्द आहोत, असेही ना. गडकरी म्हणाले.