Published On : Sat, Oct 19th, 2019

‘मुंबईकर’ झालेल्या फडणवीसांना नागपूरकरांनी मतदान करू नये..! – डॉ. आशिष देशमुख

Advertisement

पाच वर्षांपूर्वीच नागपूरचे घर कुलूपबंद करून मुंबईला नेहमीसाठी स्थायिक झालेल्या भाजपच्या श्री. देवेंद्र फडणवीसांचे सामान्य जनतेशी असलेले आपुलकीचे नाते आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता दक्षिण-पश्चिम नागपूरच्या मतदारांनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन डॉ. आशिष देशमुख यांनी जनतेला केले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख ही लढत जिंकणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

“श्री. शरद पवार आपले बारामतीचे घर बंद करून मुंबईला स्थायिक होती का? किंवा नागपूरचे श्री. नितीन गडकरी आपले घर बंद करून मुंबईला स्थायिक होतील का? नक्कीच नाही. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघाशी आता श्री. देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणे-घेणे नाही, म्हणूनच ते मुंबईला स्थायिक झाले आहेत.

त्यामुळे यावेळेस जनता त्यांचा नक्की पराभव करेल व इतिहास घडवेल तसेच या क्षेत्रात जबरदस्त परिवर्तन करेल. इंग्रज विदेशात राहून ज्याप्रमाणे भारतावर राज्य करायचे, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये राहून दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघ स्वत:ची वसाहत म्हणून वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. समाजातील विविध घटक, जे पारंपारिक भाजपचे मतदार होते, ते यावेळेस फडणवीस यांच्या विरोधात आहेत. ओपन कॅटेगरीचे जे लोक ‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’च्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत ते पूर्णत: फडणवीसांच्या विरोधात आहेत. श्री. चंद्रशेखर बावनकुळेंवर झालेल्या अन्यायामुळे संपूर्ण तेली समाज, जो भाजपचा पारंपारिक मतदार होता, तो या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे”, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले,”भारताची घसरलेली अर्थव्यवस्था, चुकीच्या पद्धतीने लागू केलेली जीएसटी, नोटाबंदी यामुळे व्यापारी वर्ग भाजपवर नाराज आहे. रोजच्या मिळकतीमध्ये घट झाल्यामुळे हा वर्गदेखील भाजपच्या नीतीच्या विरोधात मतदान करून आपला रोष व्यक्त करणार आहे. एकूण मतदारांपैकी ५० टक्के मतदार हा ३५ वर्षांखालील तरुण वर्ग आहे. मोदींमुळे भाजपकडे वळलेला हा तरुण मतदार बेरोजगारीमुळे कमालीचा त्रस्त आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र, मुद्रा योजना यातून त्यांच्या हाताला काम मिळाले नाही, रोजगार मिळाला नाही, त्यांचा स्वयं-रोजगार सुरु झाला नाही, त्यांना उद्योगधंदे टाकता आले नाहीत म्हणून हा तरुण वर्ग संपूर्णत: भाजपविरोधी मतदान करेल. कॉंग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांनाच मतदान करेल..!”
“पारंपारिकरित्या कॉंग्रेसच्या विचारसरणीवर नागपूर चालत असल्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी, जी कॉंग्रेसची विचारसरणी आहे, नागपूरची जनता पुनश्च: कॉंग्रेससोबत उभी राहिलेली दिसेल. मी आपले विकासाचे मिशन, व्हिजन, इज ऑफ लिव्हिंग या संदर्भात जी वचनं लोकांना दिली आहेत, ती मी १०० टक्के पूर्ण करेन व आर्थिक संपन्नता प्रत्येक घरार्यंत पोहोचवेन”, असे शेवटी डॉ. आशिष देशमुख यांनी आश्वासन दिले.

दि. १९ ऑक्टोबरला सकाळी दीक्षाभूमी येथून डॉ. आशिष देशमुख यांच्या महारॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत श्री. मुकुल वासनिक, श्री. प्रकाश गजभिये, श्री. प्रफुल्ल गुडधे पाटील, श्री. राकेश पन्नासे, इतर मान्यवर व हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. या महारॅलीने निरी, अजनी, लोकमत चौक, धंतोली, घाट रोड, गणेशपेठ बस-स्टँड, जाटतरोडी, आंबेडकर चौक, पर्वतीनगर, शताब्दी चौक, मनीषनगर व लगतचा परिसर दणाणून सोडला.