Nagpur : एका कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर गडकरी यांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावेळी हा प्रकार घडला.
सामंजस्य करार झाल्यानंतर गडकरी हे बोलण्यास उभारले. त्यावेळी अचानक उपस्थितांमध्ये बसलेल्यांमधून वेगळ्या विदर्भाची मागणी करत घोषणाबाजी करण्यात येऊ लागली. अचानक घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे आयोजकांनाही धक्का बसला.
त्यावेळी गडकरी हे काही क्षण थांबले. नंतर पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. इतक्यावरच न थांबत ते म्हणाले, ही काही नवीन गोष्ट नाही. असे उचक्के बरेच असतात, असा टोला लगावत आपले भाषण सुरूच ठेवले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते.