मुंबई– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी आणि ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा आज औपचारिकपणे प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटरचा प्रवास आता अवघ्या ८ तासांत शक्य होणार आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आणि इतर महायुतीचे मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवाशांची प्रतीक्षा संपली-
सुरुवातीला ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी (५२० किमी) या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर उर्वरित टप्पे टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. शेवटचा टप्पा असलेला इगतपुरी ते आमणे हा भाग उघडण्यासाठी प्रवासी आतुरतेने वाट पाहत होते – आणि अखेर ती प्रतीक्षा आज संपली. समृद्धी महामार्ग केवळ एक रस्ता नसून, तो महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरू शकतो. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मुंबईशी थेट जोडले गेले आहेत
वाहतूक व औद्योगिक गतीला चालना-
या महामार्गालगत औद्योगिक गावे, लॉजिस्टिक हब, कृषी प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच ३ आंतरराष्ट्रीय, ७ देशांतर्गत विमानतळं, ५० बंदर, आणि ६,००० किमी रेल्वे जाळ्याशी हा महामार्ग जोडलेला आहे.
हा महामार्ग राज्यातील ग्रामीण भागासाठीही विकासाचे दार उघडणारा ठरेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
फिनिशर ठरले फडणवीस-
या महामार्गाच्या उभारणीस सुरुवात करताना पंतप्रधान मोदींनी प्रारंभ केला आणि अखेरचा टप्पा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णत्वाला नेला. त्यामुळे अनेकांनी फडणवीसांना ‘फिनिशर’ म्हणून संबोधले आहे.