
नागपूर: लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनच्या वतीने आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संयोजनात मानकापूर येथील पुरातन शिव मंदिरात आयोजित तृतीय श्रावण महोत्सवात ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. या महोत्सवाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी यांच्यासह भेट देऊन पार्थिव शिवलिंगाची निर्मिती केली. तसेच पूजन आणि आरतीमध्येही सहभाग घेतला.
यावेळी महापौर नीता ठाकरे, मनपा स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दानी, माजी आमदार गिरीश व्यास, संदीप जोशी, नगरसेविका दर्शनी धवड आणि सुरेश जग्यासी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरींकडून आयोजनाचे कौतुक
यावेळी नितीन गडकरी यांनी श्रावण महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, शहरात अनेक उपक्रम सुरू होतात; मात्र ते एक-दोन वर्षांनंतर थांबतात. भगवान शंकराच्या कृपेने दयाशंकर तिवारी यांचा हा उपक्रम तिसऱ्या वर्षात पोहोचला आहे.
पहिल्या वर्षी ५१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प करण्यात आला होता. यंदा हा संकल्प ९१ लाखांवर पोहोचला असून तो सोमवारीच पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. १२ सप्टेंबरपर्यंत हा आकडा १ कोटीपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
महिनाभर सातत्याने आणि निर्विघ्नपणे असा उपक्रम राबविणे सोपे नसल्याचे सांगत त्यांनी दयाशंकर तिवारी, लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनचे पदाधिकारी आणि आयोजनाशी संबंधित सर्व संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
गडकरी यांनी सर्वांना पवित्र श्रावण मास आणि पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी हरितालिका आणि गणेशोत्सवासाठीही शुभेच्छा देत आयोजनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
८०० किलोच्या नंदीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
बैलपोळ्यानिमित्त प्रसिद्ध गोसेवक अतुल मशरू यांच्या गोशाळेतील तब्बल ८०० किलो वजनाचा नंदी दिवसभर आयोजनस्थळी आणण्यात आला होता. भाविकांना प्रत्यक्ष नंदीचे दर्शन घेऊन पूजन करण्याची संधी मिळाली. नंदीचे दर्शन आणि पूजन हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
एका दिवसात १ लाख ७ हजार ५८५ पार्थिव शिवलिंगांची निर्मिती
महोत्सवादरम्यान आज १ लाख ७ हजार ५८५ पार्थिव शिवलिंगांची निर्मिती करण्यात आली. सकाळचा अभिषेक अनिल बावनगड, रजनी बावनगड, आस्था प्रणय परमार आणि मनीषा राजेश परमार यांच्या हस्ते झाला. तर सायंकाळचा अभिषेक दशरथ साहू, संतोष साहू आणि ओमप्रकाश वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रावण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विपुल मिश्रा, विक्रम खुराणा, बंटी दीक्षित, सुनील अग्रवाल, नवीन जैन, चंदू मते, मनोज सिंह, शशिकांत हरडे, नवीन गुप्ता, सोनू तिवारी, अनिरुद्ध तिवारी, पवन तिवारी, राणी रेड्डी, सीमा कश्यप आणि रेखा वांदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.





