
नागपूर – नागपूरच्या अजनी परिसरातील जादूमहाल चौकात जुन्या भांडणातून एका 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत सर्व हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Featured Products
अजनी पोलीस ठाणे हद्दीतील जादूमहाल चौक परिसरात काल रात्री अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 10 ते 12 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दोन तरुणांना लक्ष्य करत त्यांच्यावर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात 22 वर्षीय सागर गिरीधर सलामे याचा जागीच मृत्यू झाला. सागर हा साप्ताहिक बाजारात भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा दिवसांपूर्वी सागर आणि एका अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला होता. त्याच वादाचा सूड घेण्यासाठी आरोपींनी हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेच्या रात्री महाप्रसाद कार्यक्रमाच्या नावाखाली सागरला जादूमहाल चौकात बोलावण्यात आले. सागर आपल्या मित्र हर्षल उर्फ अॅलेक्स शिंदेसोबत घटनास्थळी पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या टोळक्याने दोघांवर अचानक हल्ला चढवला.
डंडे, लोखंडी रॉड आणि चाकूने करण्यात आलेल्या या हल्ल्यात सागर जीव वाचवण्यासाठी पळाला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत नंदिनी मेडिकल स्टोअर परिसरात पुन्हा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत सागर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
त्याचा मित्र हर्षलही हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिस कारवाई-
या प्रकरणी अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून जवळपास एक डझन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात मुख्य अल्पवयीन आरोपीने आधीपासूनच हत्या करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने ऑनलाइन माध्यमातून चाकू मागवल्याची माहितीही पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.
नितीन चंद्र राजकुमार, अजनी पोलीस ठाणे अधिकारी
या घटनेमुळे नागपुरात अल्पवयीनांकडून वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.








