नागपूर : रविवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत अवघ्या २४ तासांत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी खूनाच्या घटना घडल्याने नागपूर हादरले आहे. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं असून पोलिस यंत्रणांची कार्यक्षमता आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
हिस्ट्रीशीटरचा चाकूहल्ल्यात मृत्यू-
पहिली घटना अयाचित मंदिर परिसरात घडली. या ठिकाणी कुख्यात गुन्हेगार राहुल पांडे (वय ४०) याच्यावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करत निर्दयतेने हत्या केली. राहुल पांडेवर याआधीही एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भिकाऱ्याचा दगड व कटरने निर्घृण खून-
दुसरी घटना लाल इमली चौक परिसरात उघडकीस आली. येथे शैलेंद्र नावाच्या ४० वर्षीय भिकाऱ्याचा डोक्यावर आणि मानेवर दगड व धारदार वस्तूने वार करून खून करण्यात आला. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला एक कटरही आढळून आला आहे. या प्रकरणात ‘अन्ना’ नावाचा दुसरा भिकारी संशयित असून तो मृत शैलेंद्रसोबत नेहमीच दिसत असे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, दोघांनी दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून हा खून झाला असण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संशयित अन्ना याचा शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी सांगितले की, घटनेचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. खूनामागील अचूक कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
शहरात गुन्हेगारी वाढतेय?
या दोन घटनेनंतर नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका बाजूला हिस्ट्रीशीटरचा खून, तर दुसरीकडे फुटपाथवर राहणाऱ्या भिकाऱ्याचा अमानुष खून या घटनांनी नागपूरची शांतता भंग केली आहे. पोलिसांवर नागरिकांचा दबाव आहे की दोषींना लवकरात लवकर अटक करावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.
शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.