नागपूर – शहरात हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल रात्री नंदनवन परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका कबाड दुकानात रात्रपाळीत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक अब्दुल याची काही अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि डंड्यांनी अमानुषपणे हत्या केली. विशेष म्हणजे, संपूर्ण हत्याकांड दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. सतपुडा बारच्या समोर थांबलेल्या कारमधून उतरलेले चार हल्लेखोर थेट दुकानात घुसले. अब्दुलवर त्यांनी क्रूरपणे वार करत त्याला जागेवरच रक्तबंबाळ केलं. हल्लेखोर त्याला मृत समजून पलंगाखाली फेकून पसार झाले.
दुकानमालकाने घरी बसून मोबाईलवरून लाइव्ह CCTV फूटेज पाहत असताना ही थरारक घटना त्याच्या नजरेस पडली. तो तातडीने घटनास्थळी पोहोचला आणि गंभीर अवस्थेत असलेल्या अब्दुलला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सकाळी चारच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि CCTV फूटेज ताब्यात घेतलं आहे. आरोपी कोण होते, ते कुठून आले आणि त्यांच्या वाहनाची माहिती काय, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र अद्याप कुठलाही ठोस सुराग हाती लागलेला नाही.
या घटनेनंतर शहरात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून खून आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
शहरात नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. पोलिसांची गस्त, टेहळणी आणि तत्परता यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गुन्हेगारांची बेधडक हालचाल आणि प्रशासनाची मौनव्रती हेच कायदा सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या चित्राचं प्रतिबिंब ठरत आहे.