नागपूर – नागपूर महानगरपालिका आता देवाच्या भरोश्यावर चालते आहे, अशी जहाल टीका भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकताना त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली. रस्त्यांवर साचलेला कचरा, नियमित साफसफाईचा अभाव, आणि खालावलेली नागरी सेवा यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मात्र, जोशींच्या या वक्तव्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. या परिस्थितीसाठी नेमकी जबाबदारी कुणाची?
गेल्या दहा वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे, आणि सध्या राज्यातही भाजपप्रणीत सरकार आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे गृहघर. अशा स्थितीत शहराची अवस्था जर “देवाच्या भरोश्यावर” सोडावी लागत असेल, तर तेच भाजपच्या कार्यकाळाचे अपयश दर्शवत नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची टीका-
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील मनपा प्रशासकीय यंत्रणांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राज नागपूर मनपात सुरू आहे. अनेक सामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन कामे केली जात आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, नागपूरकरांना चांगल्या सुविधा देणे ही मनपाची जबाबदारी आहे. त्यांना लुटणे थांबवले पाहिजे. शहरातील अनेक विकासकामे रखडली आहेत.
दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना या प्रकारची वक्तव्यं आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोर धरू लागल्या आहेत. मात्र, शहरातील नागरी सुविधांच्या निकृष्ट अवस्थेने सामान्य नागपूरकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.