
नागपूर : मनुस्मृतीच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संविधान सन्मान यात्रे’मुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप आणि संघाविरोधात निषेध व्यक्त केला.
एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकरी रेशीमबागच्या दिशेने पुढे जात असताना सुरेश भट सभागृहाजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारून मोर्चाचा मार्ग रोखला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी-
मोर्चा रोखल्यानंतर काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढले आणि जोरदार घोषणाबाजी केली. ‘दादागिरी नही चलेगी’, ‘माफी मांगो’ तसेच भाजपविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
मनुस्मृतीचे दहन करून निषेध-
आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करत आपला निषेध नोंदवला. अनेक आंदोलकांच्या हातात संविधानाच्या प्रती होत्या. संविधानाचा सन्मान आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले.
“देशाचा कारभार संविधानानुसारच चालला पाहिजे, मनुस्मृतीच्या विचारांनुसार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच आपल्या नेत्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावर भाजपने माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
तरुणींचीही मोठी उपस्थिती-
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि प्रदेश सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. युवकांसोबत मोठ्या संख्येने तरुणींनीही आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा रोखताना काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.संविधानाचा सन्मान आणि मनुस्मृतीचा निषेध या मुद्द्यांवरून झालेल्या या आंदोलनामुळे नागपुरातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.




