
सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांच्यावर जोरदार टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘वंदे मातरम’ आणि हिंदुराष्ट्राबाबत आक्षेप घेणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीने वागण्याचे केलेले आवाहन योग्य असल्याचे सांगताना राणे म्हणाले की, जगभरात युद्धजन्य परिस्थिती असताना भारत सुरक्षित आणि सक्षम आहे. “मोदींसारखे नेतृत्व देशाला लाभणे हे भारतीयांचे भाग्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
डिझेल-पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन करताना त्यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातही इलेक्ट्रिक बोटींचा वापर वाढवण्यावर भर दिला. मच्छीमारांना कर्ज आणि शासकीय मदतीसाठी मत्स्य व्यवसाय विभाग पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
परदेश दौरे टाळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित करण्याची संधी असल्याचे राणे म्हणाले. हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राने या काळाचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही राणेंनी प्रत्युत्तर दिले. “मोदींना देशाच्या जनतेची ‘मन की बात’ समजते म्हणूनच जनता त्यांना वारंवार निवडून देते,” असे ते म्हणाले. भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचाही दावा त्यांनी केला.
राज्य महिला आयोगाच्या अहवालावर बोलताना राणेंनी धर्मांतर आणि ‘द केरला स्टोरी’सारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. “जिहादी मानसिकतेच्या लोकांचा चेहरा आता उघड होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ओवेसी यांच्या ‘वंदे मातरम’ संदर्भातील वक्तव्यावर टीका करताना राणे म्हणाले, हा देश देवी-देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी पाकिस्तानात जावे. हिंदुराष्ट्र आणि वंदे मातरमकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे.








