नागपूर : हिंगणा तालुक्यातील काटंगधरा गावात बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये सुरू असलेला वाद अखेर रक्तरंजित शेवटाला पोहोचला. मोठ्या भावाने झोपेत असलेल्या धाकट्या भावावर लाकडी दांडक्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबाई बाबुलाल पांढरम (60) यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचे दोन मुलगे हरिश्चंद्र बाबुलाल पांढरम (34) आणि शुभम बाबुलाल पांढरम (28) यांच्यात हरिश्चंद्रच्या बेरोजगारीवरून नेहमी वाद होत होते. शुभम हा चार वर्षांपूर्वी पत्नीपासून विभक्त झाला होता. तो मोठ्या भावाला कामधंदा करण्याचा सल्ला देत असे.
22 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार वाद झाला. त्यावेळी वडिलांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. मात्र, त्यानंतरही harishchandraच्या मनातील राग शांत झाला नाही.
23 मेच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्य अंगणात झोपले असताना हरिश्चंद्रने झोपेत असलेल्या शुभमवर लाकडी काठीने हल्ला केला. डोक्यावर वारंवार प्रहार केल्याने शुभम गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी हरिश्चंद्रला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत शेलमाके पुढील तपास करीत आहेत.








