Advertisement
नागपूर : काल झालेल्या मुसळधार पावसाने स्वरूप नगर परिसराला अक्षरशः जलमय केले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. धान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह घरातील जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले.
पाणी ओसरल्यानंतरही चिखल, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष व प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मुसळधार पावसानंतर नागपुरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीस राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला.
शहरातील रखडलेली विकासकामे, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मुसळधार पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आणि हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. तसेच, नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचा तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.





