
नागपूर -शहरात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्या सहा दिवसांत पाच हत्यांच्या घटनांनी शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. किरकोळ वाद, कौटुंबिक तणाव, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक वैमनस्य या कारणांमधून रक्तपाताच्या घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ताज्या घटनेत पंचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लश्करीबाग परिसरात 65 वर्षीय इंदू चौहान यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. चौहान या आपल्या पतीसोबत राहत होत्या. घरातच झालेल्या या खुनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचपावली पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात ही हत्या ओळखीच्या व्यक्तीकडून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घरातील परिस्थिती, कौटुंबिक संबंध, आर्थिक व्यवहार आणि परिसरातील हालचाली यांची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांची माहिती गोळा केली जात आहे.
नागपूर सलग हत्यांनी हादरले-
गेल्या काही दिवसांपासून शहरात घडणाऱ्या खूनाच्या घटनांनी नागपूरकरांची चिंता वाढवली आहे.
15 मे रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंड्याच्या कारणावरून विवाहितेची हत्या करण्यात आली. पती, भाऊ आणि वडिलांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप आहे.
16 मे रोजी गिट्टीखदान परिसरात लोन एजंट अजय श्रीवास यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या प्रकरणात वैयक्तिक संबंधातून कट रचल्याची माहिती समोर आली.
17 मे रोजी एमआयडीसी परिसरात एका 32 वर्षीय मजुराची त्याच्याच सहकाऱ्यांनी हत्या केली.
या घटनांनंतर आता लश्करीबागमधील वृद्ध महिलेच्या हत्येने शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
पोलीस अलर्टवर; तरीही गुन्हेगार बिनधास्त-
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गस्त वाढवण्याचे, सराईत गुन्हेगारांवर कारवाई तीव्र करण्याचे आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सलग घडणाऱ्या हत्या आणि हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
शहरात किरकोळ कारणांवरून जीव घेतले जात असल्याने “नागपुरात कायद्याची भीती संपली का?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. नागपूर पोलिसांसमोर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवून शहरात पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.








