Published On : Tue, Jun 12th, 2018

ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी महावितरणचा नवीन उपक्रम

Advertisement

नागपूर: वीजबिलांचा नियमित करण्याची तयारी असतांनाही बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे यासाठी फ़िरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीस विदर्भातील 28 गावांसह राज्यातील 50 गावांतून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यास मिळणा-या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्ती निश्चित केल्या जाणार आहे.

साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार असून या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या गावांमधील साप्ताहीक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फ़िरविण्यात येणार असून या फ़िरत्या विअज भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक, प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात महावितरणच्या कर्मचा-यांसोबतच जनतेला याबाबत माहिती मिळण्यासाठी यात उद्घोषणा करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.

दुर्मिळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावांसोबतच वीज भरणा केंद्राची सोय उपलब्ध नसलेल्या गावांचीही या सुविधेसाठी निवड करण्यात आली असून दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची वीज बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांचाही यात विचार करण्यात येत आहे. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अश्या गावातूनही ही मोबाईल व्हॅन फ़िरविल्या जाणार आहे.

प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या या सुविधेला वीज ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनंतर घेण्यात येऊन त्या ठिकाणी ही सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत विचार केला जाणार असून प्रायोगित तत्वावर राबविल्या जाणा-या या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातील कापसी आणि अडेगाव, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा, हिरडाव आणि आसलगाव जामोद, वाशिम जिल्ह्यातील मोप, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव मंगूल दत्तगिर आणि राजूरा बाजार, यवतमाळ जिल्ह्यातील मुकुदमन, शेंभलपिंपरी आणि अकोला बजार, चंद्रपूर जिल्ह्यातील देव्हाडा, धुग्गूस आणि शेगाव, गडचिरोली जिल्ह्यातील घोट आणि कोटगाव, भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि बारवा, गोंदीया जिल्ह्यातॉल साखरी टोला आणि फ़ुलसुर, नागपूर जिल्ह्यातील तेलगाव, भिलगाव, येरखेडा आणि पारशिवनी तर वर्धा जिल्हयातील काजूमवरग्राम, पोहरा आणि गौल या गावांचा समावेश असून, लवकरच ही सुविधा येथील गावक-यांसाठी महावितरणतर्फ़े सुरु करण्यात येत आहे.