
मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून देशातील विविध भागांत सक्रिय होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने देशातील किमान 10 राज्यांसाठी मुसळधार पाऊस, वादळी वारे, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 19 ते 22 मे आणि उत्तराखंडमध्ये 20 ते 22 मे दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
दरम्यान, अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचा प्रभाव वाढला असून 24 मेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालसह मध्य भारतातही पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील भागात पावसाची शक्यता अधिक असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळू शकतात. तसेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही वातावरणात बदल जाणवू शकतो. काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ अजूनही उकाड्याच्या तडाख्यात-
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप तीव्र उष्णतेची लाट कायम असून नागरिक, पशू-पक्षी आणि जनावरांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढील आठवड्यात पावसाच्या हालचाली वाढल्यास तापमानात घट होऊन वातावरण आल्हाददायक होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.








