
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून तळकोकणात त्याचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. गोवा व्यापल्यानंतर मान्सूनने दक्षिण कोकणात पुढे सरकत राज्यात हजेरी लावली असून आता त्याची वाटचाल नागपूर आणि राज्याच्या इतर भागांकडे सुरू झाली आहे.
यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन नेहमीपेक्षा काही दिवस उशिराने झाले होते. ४ जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेग घेत कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि अरबी समुद्रातील काही भाग व्यापले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत तो महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाला आहे.
तळकोकणात प्रवेश झाल्यानंतर मान्सूनचा पुढील टप्पा मुंबई आणि उत्तर कोकणाचा असतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, वातावरण सध्या अनुकूल असल्याने पुढील काही दिवसांत मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारेही वाहू शकतात.
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला होता. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले होते. आता मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याबरोबरच खरीप हंगामाच्या तयारीलाही वेग येणार आहे.
दरम्यान, यंदा मान्सूनच्या प्रगतीकडे आणि आगामी पर्जन्यमानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







