नवी दिल्ली:देशातील मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया लवकरच त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या दरवर्षी टप्प्याटप्प्याने प्लॅनच्या किमती वाढवत आहेत. आता पुन्हा वर्षाअखेरीस जवळपास १० ते १२ टक्क्यांनी टॅरिफ वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः मध्यम आणि प्रीमियम प्लॅन महाग होण्याची शक्यता असून, स्वस्त प्लॅनमध्ये मोठा बदल दिसणार नाही. मात्र, वारंवार रिचार्ज करणारे किंवा दोन सिम वापरणारे ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
दरम्यान, मे २०२५ मध्ये देशातील टेलिकॉम क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. फक्त एका महिन्यात तब्बल ७४ लाख नवीन अॅक्टिव्ह युजर्स नेटवर्कमध्ये सामील झाले असून, एकूण सक्रिय ग्राहकसंख्या १.०८ अब्जांच्या वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात युजर्स वाढले तरी कंपन्यांना महसूल वाढवण्यासाठी प्लॅन महाग करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऑपरेशनल खर्च, ५जी नेटवर्क विस्तार आणि स्पेक्ट्रम फी यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरत असल्याचेही सांगितले जात आहे.
या दरवाढीमुळे आधीच महागाईच्या तडाख्यात अडकलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण येणार असून, मोबाईल सेवा खरंच परवडणारी राहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.