Published On : Thu, Jul 18th, 2019

महिला पक्षनेता ही गौरवाची बाब -महापौर नंदा जिचकार

Advertisement

बसपा पक्षनेते म्हणून वैशाली नारनवरे यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात कुठल्या पक्षाच्या नेतेपदी महिलेची वर्णी लागणे हे क्वचितच होते. बसपाच्या पक्षनेतेपदी वैशाली नारनवरे या महिला नगरसेविकेची निवड करून बहुजन समाज पार्टीने नवा पायंडा घातला आहे. पक्षनेतेपदी महिलेची निवड ही गौरवाची बाब असून त्यांच्या कार्यकाळात निश्चित चांगले कार्य होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महागरपालिकेच्या बसपा पक्षनेतेपदाचा पदभार नगरसेविका वैशाली नारनवरे यांनी गुरुवारी (ता. १८) स्वीकारला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, मंगेश ठाकरे, जितेंद्र घोडेस्वार, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, माजी गटनेता गौतम पाटील, मुरली मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, भाईचारा समितीचे शहर अध्यक्ष त्रिभुवन तिवारी, आशीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, नगरसेविका वंदना चांदेकर, मंगला लांजेवार, ममता सहारे, नगरसेवक नरेंद्र वालदे, संजय बुर्रेवार, उत्तर नागपूर अध्यक्ष अविनाश नारनवरे, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कुठलीही गोष्ट सहज मिळत नसते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. महानगरपालिकेतील बसपाच्या पक्ष कार्यालयालाही इतिहास आहे. संघर्ष करून हे कार्यालय पक्षाने मिळविले आहे. सत्तेत आता दहा नगरसेवक असले तरी आता मनपात सत्ता हे बसपाचे लक्ष्य आहे. पुढे विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळे नगरसेवकांनी लोकांच्या समस्यांकडे अधिकाधिक लक्ष पुरवावे. समस्यांचे निराकरण करावे. नवनिर्वाचित पक्ष नेत्यांनी पक्षाच्या वतीने सभागृहात लोकांचा आवाज बुलंद करावा. पक्षातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आपसी चर्चेतूनच विषय मांडावे, असेही ते म्हणाले.

नवनियुक्त पक्षनेता वैशाली नारनवरे म्हणाल्या, पक्षाने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेत पक्षाची नवी ओळख आणि दबदबा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या कार्यकाळात पाणी आणि शिक्षण हे दोन विषय लावून धरू, असे त्यांनी सांगितले.

अन्य मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर यांनी मानले. कार्यक्रमाला बसपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.