Published On : Thu, Feb 27th, 2020

मनपातर्फे १२० टँकर्स बंद करण्याचा निर्णय

Advertisement

हुडकेश्वर नरसाळा टँकरमुक्त : मनपाच्या प्रतिवर्ष कोटींच्या खर्चाची बचत

नागपूर : नागपूर शहरात पाणीपुरवठा करणा-या ३४६ टँकर्सपैकी १२० टँकर्स बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणारे मनपाच्या लाखो रुपयांची बचत झाली आहे.

नागपूर शहरात जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपातर्फे सद्यस्थितीत ३४६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या टँकर्सवर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च होतो. १२० टँकर्स बंद करण्यात आल्याने दरवर्षी सुमारे १० ते ११ कोटी रुपये खर्चाची बचत होणार आहे.

शहरात जलवाहिनी नसलेल्या भागामध्ये शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधी व नागपूर सुधार प्रन्यासद्वारे अनेक ठिकाणी जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहेत. मनपाद्वारे या जलवाहिन्या चार्ज करून नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. नासुप्र द्वारे टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांपैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोन अंतर्गत ९५५ अभिन्यासापैकी ८७६ अभिन्यास मनपातर्फे चार्ज करून सुमारे १७००० नळ जोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली.

विशेष म्हणजे मागील वर्षी नागपूर शहरास नव्याने जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर नरसाळा या भागात शासकीय निधी अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. या भागातील जलवाहिन्या चार्ज करून सुमारे ८८४० नळ जोडण्या देण्यात आल्या आहे. हुडकेश्वर नरसाळा भागामध्ये ७६ टँकर्सद्वारे दररोज ५३० फे-या करण्यात येत होत्या. जलवाहिन्या चार्ज झाल्याने ९० टक्के भाग टँकरमुक्त झाला आहे. मार्च २०२० अखेरीस संपूर्ण हुडकेश्वर नरसाळा टँकरमुक्त करण्याचे मनपाचे लक्ष्य आहे.

आणखी १०० टँकर्स होणार कमी

१२० टँकर्स बंद करण्यात आल्यानंतर लवकरच आणखी १०० टँकर्स बंद करण्याचा मनपाचा उद्देश आहे. नासुप्रद्वारे वांजरा येथे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी चार्ज झाल्यास कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तीनापुर, बंधु सोसायटी, भिमवाडी आदी भागातील नागरिकांना नळ कनेक्शन दिल्यास या भागातील टँकर्सच्या ६० ते ७० फे-या कमी होतील. याशिवाय नासुप्रद्वारे नारा व कळमना भागातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्णत्वास येत आहे. येत्या दोन महिन्यात दोन्ही भागातील टाक्या मनपाकडे हस्तांतरीत होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सदर भागात अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टाक्या चार्ज झाल्यावर नारा कमांड एरीया अंतर्गत समतानगर, पांजरा येथील टँकर्सच्या दररोजच्या ७० ते ८० फे-या कमी होतील.

याशिवाय नासुप्रद्वारे निर्मित कळमना टाकी चार्ज झाल्यास राजलक्ष्मीनगर, पार्वतीनगर, देवीनगर, गुलशननगर, राजीव गांधी नगर, कळमना या भागातील टँकर्सद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे येथील दररोजच्या १८० फे-या कमी होतील. अमृत योजनेअंतर्गत लकडगंज झोन अंतर्गत सुरू असलेले जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास दररोज ४५० फे-या कमी होतील. उपरोक्त सर्व टँकर्सच्या फे-या कमी झाल्यास येत्या काळात आणखी १०० टँकर्सची संख्या कमी होणार आहेत.