
अहिल्यानगर : राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर परिसरात मोठी कारवाई करत काही तरुणांची सखोल चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडिया हँडल्स आणि संशयित आंतरराष्ट्रीय संपर्कांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ATS ने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे टाकत काही संशयितांची चौकशी केली असून, अनेक मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली आहेत. या सर्व उपकरणांतील डेटा तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
सोशल मीडियावरील संपर्काचा संशय-
चौकशीदरम्यान काही तरुणांनी पाकिस्तानमधील इंस्टाग्राम अकाउंट्स आणि मोबाईल नंबरद्वारे संपर्क झाल्याचे सांगितले आहे. एका तरुणाने संवाद झाल्यानंतर घाबरून संबंधित चॅट्स डिलीट केल्याचे कबूल केले आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात एका तरुणाला पाकिस्तानमधील नंबरवरून फोन आल्याचे समोर आले आहे. या संभाषणात परिसरातील माहिती विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित तरुणाने कोणतीही संवेदनशील माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू-
या प्रकरणात अनेक चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स हटवण्यात आल्याने ATS ने तांत्रिक तपासाला गती दिली आहे. डिलीट झालेला डेटा रिकव्हर करून सत्य परिस्थिती समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
छापेमारीदरम्यान काही संशयित घरी उपस्थित नसल्याने त्यांचा शोधही सुरू आहे. या सर्व घडामोडींमागे कोणताही मोठा कट किंवा नेटवर्क सक्रिय आहे का, याचा तपासही यंत्रणांकडून सुरू आहे.
सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी चौकशीची व्याप्ती वाढवण्यात आली असून पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







