Published On : Sat, Aug 31st, 2019

देशाला आर्थिक मजबूत बनविण्यासाठ़ी महिला बचत गटाची भूमिका महत्त्वाची पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रज्वला अंतर्गत महिला बचत गट प्रशिक्षण मेळावा

नागपूर/कामठी : आर्थिक गुंतवणूक, बचत आणि नफा यात महिला निपुण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या शतकात देशाला जगात आर्थिकदृष्ट्या मजबूत बनविण्याचे स्वप्त पाहिले आहे. त्यात महिला बचत गटाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वला योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातील महिला बचत गटाचा प्रशिक्षण कार्यक्रम आज कामठीजवळील रनाळा येथे पंकज मंगल कार्यालय सभागृह येथे दुपारी पार पडला.

याप्रंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर, अर्चना डेहनकर, नीता ठाकरे, दिपाली मोकाशी, कृपालिनी सिनकर, मनीषा रेवतकर, वर्षा ग्रेसी, प्रतिभा मांडवकर, अनुराधा अमीन, विमल साबळे, खंवि अधिकारी सचिन सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बावनकुळे यांनी विविध शासकीय योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावे असे आवाहन केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गटाची भूमिका महत्त्वाची आहे. बचत गटाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे, असेही त्या म्हणाल्या.

महिला बचत गटाच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 20 कोटींच्या निधीतून उद्योजिका भवनाची पायाभरणी केली असल्याचे ना. बावनकुळे यांनी सांगताच महिलांना टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. नीता ठाकरे यांचाही यावेळी भाषण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विनी फुलकर, अर्चना तांबे, सुरेश कोल्हे, शुभांगी कामडी, अनिता मोहाडीकर, वैशाली चरपे, अनुजा पाठक, सारिका चंद्रिकापुरे, कश्यप सावरकर, अरविंद अंतुरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बचत गट प्रतिनिधी, महिला सरपंच उपसरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी, सेविका मदतनीस उपस्थित होत्या.

राज्यात सुमारे 3 लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसर्‍या टप्प्यात एक जिल्हा, एक वस्तू असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तिसर्‍या टप्प्यात बचत गटाच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.