
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम दावा केला. राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील सर्व अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
ही निवडणूक संख्याबळावर आधारित असल्याने ज्या पक्षाकडे अधिक सदस्य आहेत, त्यांचाच विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसने ज्या ठिकाणी आपली ताकद कमी आहे, त्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसने दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने परिस्थितीचे वास्तव स्वीकारल्यास महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून जे ऐकणार नाहीत त्यांच्याबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. महायुतीत कोणतीही मोठी बंडखोरी होणार नसून दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यवतमाळमधील काँग्रेस उमेदवारीवर टीका-
यवतमाळमधील काँग्रेस उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, “ही निवडणूक लढवून नेमका काय फायदा होणार, याचा काँग्रेस उमेदवारांनी विचार करावा.” मोठ्या मतफरकामुळे काही ठिकाणी निवडणूक लढविण्याचा अर्थ नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधींवर निशाणा-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, त्यांना गरिबी आणि आर्थिक अडचणींचे वास्तव समजत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणासाठी विविध योजना राबवल्या असून देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.
कळमना बाजार समितीला राष्ट्रीय मान्यता-
कळमना बाजार समितीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, कळमना बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांपैकी एक आहे. राज्य सरकारने तिला राष्ट्रीय बाजार समिती म्हणून मान्यता दिली असून त्यामुळे नागपूर आणि विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
विप्लव बाजोरिया प्रकरणावर प्रतिक्रिया-
विप्लव बाजोरिया प्रकरणावर बोलताना त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. या प्रकरणात सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







