
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली आणि बोंबिल टेक परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने आणि जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यामुळे एका आदिवासी कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर लचके यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेली. अचानक आलेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. घराचे छप्पर उडाल्याने लचके कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरातील आदिवासी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्यात यावी, तसेच प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून मदतीबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







