Published On : Tue, Oct 30th, 2018

दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी महावितरणने कंबर कसली

Advertisement

नागपूर: प्रकाशपर्व अर्थात दिवाळसणाला काही दिवसच शिल्लक असून येणा-या प्रकाशोत्सवाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीज वाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत.

वीज तारांच्या लगतच्या झाडांच्या फ़ांद्या तोडणे, रोहीत्रे, वितरण पेट्यांची आवश्यक ती दुरुस्ती करणे, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करणे, नादुरुस्त असलेले किटकॅट बदलविणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाव व उच्चदाब वाहिन्यांचे गार्डींग व्यवस्थित करून घेणे, योग्य क्षमतेचे वितळ तार (फ़्यूज वायर) टाकणे, विभागिय, मंडळ आणि क्षेत्रिय स्तरावरील नियंत्रण कक्ष तीन्ही पाळ्यांत (24X7) सुरु ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देशही खंडाईत यांनी दिले आहेत.

दिवाळसणात मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असल्याने अश्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वीज अपघात होणार नाही यासाठी स्थानिक कर्मचा-यांनी दक्ष राहून योग्य त्या उपाययोजना करणे, या काळात वीजपुरवठा अखंडित राहील यासाठी विभागिय अधिकारी, उपविभागिय अधिकारी व शाखा अधिकारी यांनी दिवाळी पुर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थित राहण्यासोबतच या संपुर्ण प्रकाशपर्वादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी असणे बंधनकारक असून सक्षम अधिका-यांच्या परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, अश्या सुचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन जनमित्र पातळीपर्यंत याबाबत सर्वांना आवश्य्क ते दिशानिर्देश देण्याचे आवाहनही भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.