मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी परीक्षांच्या तारखांची माहिती दिली.बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान घेण्यात येतील.
दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार असून, प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान पार पडणार आहेत.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत दहावी-बारावीच्या अंतिम परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्याची पद्धत असताना यंदा सप्टेंबरमध्येच परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, हा वेळापत्रक लवकर जाहीर करण्यामागील उद्देश असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल साधारणतः मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधारासाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेण्यात येते




