Published On : Sun, Sep 18th, 2022

क्षयरोग मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Advertisement

क्षयरोग मुळीच असाध्य रोग नाही. औषधोपचाराने व योग्य आहाराने क्षयरोग रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, असे सांगून महाराष्ट्राने लोकसहभागातून क्षयरोग मुक्त होऊन ‘प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत’ अभियानात देशात आघाडी घ्यावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १७) राजभवन येथे ‘पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

पस्तीस वर्षांपूर्वी आपल्याला झालेला क्षयरोग औषधोपचाराने पूर्णपणे बरा झाला असून आपण आज ८० व्या वर्षी देखील दुप्पट उत्साहाने काम करीत आहोत असे राज्यपालांनी सांगितले.

पंतप्रधान जो संकल्प सोडतात तो पूर्णत्वाला नेतात. यापूर्वी देखील घरोघरी शौचालय, प्रत्येकाचे बँकेत खाते आदी उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवले असे सांगून सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरजू रुग्णांना पोषण आहार देण्याच्या कामी सहकार्य करण्यासाठी दात्यांनी व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

या दृष्टीने आपण स्वतः, आपले सचिव तसेच विशेष सचिव हे सर्व जण प्रत्येकी एका रुग्णाचे पालकत्व घेण्यास तयार असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले. राज्यात आतापर्यंत ९१७८ रुग्णांना पौष्टिक धान्य वाटपाची सोय झाल्याची दखल घेऊन राज्याने सर्वप्रथम १ लाख निक्षयमित्र नोंदविण्याचे लक्ष्य ठेवावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

देशापुढील आव्हान

जगाच्या दोन तृतीयांश क्षयरोग रुग्ण भारतात असून दरवर्षी पाच लाख लोक क्षयरोगाने मृत्युमुखी पडतात. पूर्वी एक लाखामागे २०० टीबी रुग्ण होते. नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार क्षयरुग्णांची संख्या देशात प्रतिलक्ष ३१६ रुग्ण इतकी झाली आहे याची दखल घेऊन पंतप्रधानांनी २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली.

टीबी रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था रुग्णांना दत्तक घेऊ शकतात असे त्यांनी सांगितले. राज्यात १.४२ लाख लोक उपचाराधीन असून ९१७८ रुग्णांना ९६० निक्षय मित्रांच्या मदतीने पोषण आहार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी १०० निक्षय मित्रांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्षयरोग बाधित व्यक्तींच्या नातलगांना यावेळी पोषण आहार सामग्री भेट देण्यात आली.

कार्यक्रमाला राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्याचे प्रमुख डाॅ. एन. रामास्वामी, सहसंचालक रामजी आडकेकर, मुंबई शहर तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी उपस्थित होते.