नागपूर: महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती नागपूर यांचे वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारोह मातृसेवा संघ सभागृह, सिताबर्डी नागपूर येथे नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोरकर सहा. आयुक्त जीएसटी नागपूर आणि प्रमुख मार्गदर्शक डाॅ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. डाॅ. शैलेंद्र लेंडे रा.तु.म. विद्यापीठ नागपूर, प्रा.डाॅ. चंद्रशेखर चांदेकर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर यांनी प्रबोधन पर भाषणे केलीत.
जो समाज कालानुरूप बदल स्विकारतो तोच प्रगती करीत असतो: डॉ. श्रीनिवास खांदेवाले
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील दि. २६.११.१९४९ चे भाषण आजही कालानुरूप व महत्वपूर्ण आहे. आपल्याला संविधानाप्रमाणे मताधिकार तर प्राप्त आहे परंतू त्याचा वापर करून समाजवादी समाज आम्हाला अजूनही निर्माण करता आला नाही.. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समानता अद्याप निर्माण होऊ शकली नाही. राजकीय व आर्थिक बदल लवकर होतात, मात्र सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अपेक्षित बदल लवकर होत नाहीत. जो समाज कालानुरूप बदलांचा स्विकार करतो, तो प्रगती साध्य करतो. आणि जो समाज बदल स्विकारत नाही, तो विकास प्रक्रियेत मागे पडतो. असे विचार डाॅ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केलेत.
वैचारिक वारसा खंडित झाल्याने मातंग समाज मागे पडला : प्रा.डाॅ शैलेन्द्र लेंडे
क्रांतिगुरू लहूजी साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पर्यंत वैचारिक वारशाची शृंखला व्यवस्थित आलेली दिसते. पुढे मातंग समाजाचा हा वैचारिक वारसा खंडित होतो . हा वैचारिक वारसा खंडित झाल्यानेच मातंग समाज मागे पडला असल्याचे मत प्रा. डॉ शैलेन्द्र लेंडे यांनी व्यक्त केले.
आपल्या महापुरूषांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या : प्रा. डाॅ. चंद्रशेखर चांदेकर
आपण आपल्या महापुरूषांच्या जयंत्या धुम धडाक्यात साज-या करतो मात्र त्यांचे विचार स्विकारत नाही. समाजाने पुढे जाण्यासाठी आपल्या महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे, असे विचार प्रा. डाॅ चंद्रशेखर चांदेकर यांनी व्यक्त केले.
समाजात बुद्धिप्रामाण्यवाद व नितीमत्ता रूजणे महत्वाचे आहे : प्रदीप बोरकर
आज पुन्हा देश संक्रमण काळातून जात आहे. जाती – जाती मधील दरी वाढत आहे. याला चातुर्वर्ण्य व्यवस्था दोषी आहे… महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला बुद्धीप्रामाण्यवाद व नितीमत्ता समाजाने अंगिकारली तरच निकोप समाज निर्मिती शक्य आहे.. असे विचार अध्यक्षीय भाषणातून प्रदीप बोरकर यांनी मांडले.
या कार्यक्रमात प्रा. डाॅ. अशोक कांबळे, चंद्रकांत वानखेडे, भैय्याजी बावणे, लहानुजी इंगळे, शंकरराव वानखेडे, प्रभुजी तायवडे, बुधाजी सुरकार, डी एम कावळे, जेठूजी वाघमारे, रायभान डोंगरदिवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची भूमिका महादेवराव जाधव यांनी मांडली. अरविंद डोंगरे यांनी सूत्र संयोजन केले. प्रकाश डोंगरे यांनी आभार प्रकट केले.
या कार्यक्रमासाठी पद्माकर बावणे, सुधीर खडसे, विनोद लोखंडे, रमेश बावणे, नरेशचंद्र कांबळे, भारत डोंगरे, बबनराव जगधने, शिवशंकर ताकतोडे, राजेश खंडारे, सुरेश वानखेडे, संजय ठोसर आणि महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती च्या अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी योगदान दिले.