
मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस पावसाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३१ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी कोकण, गोवा तसेच घाटमाथ्यावरील भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात वाऱ्यांचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातील बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून हवामान विभागाने ३१ जिल्ह्यांसाठी विविध स्तरांवरील इशारे जारी केले आहेत. यामध्ये ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट रायगड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट परिसरासह छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातही पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदी-नाले, पूरप्रवण भाग आणि घाटमार्गांवर जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




