
नागपूर: दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नागपूर परिमंडलात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशात शांतता, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महावितरणचेच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थितांना ही प्रतिज्ञा दिली. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत.
आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी प्रतिज्ञा यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.








